निवडणुकीदरम्यान सतत चर्चेत राहणारा विषय म्हणजे आचारसंहिता. परंतु सामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात जसे की आचारसंहिता म्हणजे काय? त्याचे नियम आणि कायदे काय आहेत?

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणुक हा एक सण मानला जातो आणि सर्व राजकीय पक्ष आणि मतदार या उत्सवात एकत्र सहभागी होतात.

निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये यासाठी ठरवलेले नियम म्हणजे आचारसंहिता.

निवडणूकीची तारीख ठरवण्याचे संपूर्ण अधिकार हे निवडणूक आयोगाकडे असतात. मतदानाच्या 21 दिवस अगोदर आचारसंहिता लागू होते आणि निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यावर लगेच आचारसंहिता ही लागू करण्यात येते.

निवडणुकीदरम्यान समाजात जाती, धर्म, वंश, भाषा यांच्या आधारे वाद निर्माण होतील किंवा फूट पडेल असे कोणतेही कृत्य, भाषण, प्रचार, घोषणा किंवा आश्वासने राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने देण्यास मनाई असते.

मतदारांना महागड्या वस्तू भेट देणे, पैसे वाटणे आणि विविध प्रकारचे आमिष दाखवणे यासाठी मनाई आहे.निवडणुकीचा प्रचार आणि सभा रात्री दहा वाजेच्या आतच संपवणे बंधनकारक असते.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही नवीन योजनेची घोषणा करता येणार नाही व तसेच कुठल्याही योजना किंवा इमारतीची अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन केले जाऊ शकत नाही.