Devshayani Ekadashi 2024: आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी किंवा देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. यावर्षी दिनांक 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी आहे. हिंदू धर्मामध्ये सण व उत्सव यांना विशेष महत्त्व आहे. एकादशीचे महत्त्व देखील तितकेच विशेष आहे. दरवर्षी 24 एकादशी असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. या एकादशीला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवसापासून चातुर्मास देखील सुरू होत असतो. आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) म्हंटले की सर्वात पहिले पंढरपूर आणि पांडुरंगाची प्रतिमा डोळ्यासमोर तयार होते. परंतु कित्येकांना प्रश्न पडत असतो की आषाढी एकादशी आणि पंढरपूर यांचा संबंध काय? देवशयनी एकादशीला खरंच देव झोपी जातात का? चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
सामग्री सारणी
Devshayani Ekadashi 2024: देवशयनी एकादशी म्हणजे काय?
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू झोपतात आणि चार महिन्यानंतर जागे होतात असे म्हंटले जाते.
म्हणूनच या दिवसापासून चातुर्मास सुरू झाल्याचे मानले जाते. भविष्यपुराण, पद्मपुराण आणि श्रीमद् भागवत पुराणानुसार हरिशयनाला योगनिद्रा असे म्हटले गेले आहे. पद्मपुराणानुसार या दिवशी व्रत किंवा उपवास केल्याने विविध प्रकारच्या पापांपासून मुक्तता मिळते. या दिवशी मनोभावे पूजा केल्याने स्त्रियांना मोक्ष प्राप्त होतो.
देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) देखील म्हणतात. आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. अध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे.
Devshayani Ekadashi 2024: विठ्ठल भक्तांची पंढरपूर वारी
आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) प्रसिद्ध आहे ती विठुरायाच्या भक्तांच्या पंढरपूरच्या वारीसाठी (Pandharpur Wari). भक्तिमय वातावरणात ज्ञानोबा – तुकोबांचा जयघोष करत लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या तालात शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपूरला येत असतात. वारीमध्ये चालत असताना जात, धर्म, पंथ, वर्ण असा कुठलाही भेद न ठेवता आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेणे ही एकच अपेक्षा वारकऱ्यांमध्ये असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पांडुरंगाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येत असतात आणि यालाच आषाढी वारी असे म्हणतात.
आषाढी एकादशीच्या (Aashadhi Ekadashi) निमित्ताने शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, देहू येथून संत तुकाराम महाराजांची, पैठणहून एकनाथांची, एदलाबाद येथून मुक्ताबाई यांची पालखी पंढरपूरला येत असते. ‘माऊली माऊली’ चा गजर करत आलेले असंख्य विठ्ठल भक्त चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात आणि आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतात.

Devshayani Ekadashi 2024: आषाढी एकादशीला खरंच देव झोपी जातात का?
या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होत असतो. असे म्हणतात की भगवान विष्णू चार महिन्यांसाठी झोपी जातात. आषाढी एकादशी पासून देव झोपी जाण्याच्या अनेक कथा आणि कल्पना आहेत. माणूस जेव्हा झोपी जातो तेव्हा वर्तमान स्थितीतील चालू घडामोडींकडे निद्रित अवस्थेत दुर्लक्ष होत असते. मनुष्य एकदा झोपी गेला की त्याला खात्री असते त्याची झोप पूर्ण झाल्यावर त्याची स्मरणशक्ती पुर्ववत होणार आणि त्याच्या दैनंदिन क्रियेसाठी तो सज्ज होणार. झोपेतून जागी झाल्यानंतर स्मरणशक्ती पुर्ववत होणे ही देवाची कृपाच आहे. थोडक्यात मनुष्यप्राणी हा देवाच्या भरवशावरच झोपी जात असतो. मग प्रश्न पडतो की जो संपूर्ण सृष्टीचे पालन करतो तो भगवंत झोपी जाऊ शकतो का?
माणसाला थकवा आला की झोप येते. कंटाळा आला की झोप येते. एखादे नाटक पाहत असताना, व्याख्यान ऐकत असताना, चित्रपट पाहत असताना, माणसाला जर त्यात रस नाही वाटला तर साहजिक झोप येते. अभ्यास करायला घेतला तर विद्यार्थ्यांना झोप येणे हे कायम आपण ऐकत असतो. अनेक वेळा काही लोक झोपेची सोंग देखील घेत असतात.
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी देवशयनी एकादशी बद्दल बोलताना सांगितले होते की काही लोकांना भगवान झोपतो ही कल्पना जुनी, पुराणातून शोधून काढलेली कथा आहे असं वाटते. पण तसे नाही. वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य सोळाही कलांनी फुलून उठते. मानवाला जीवन मिळते. शेतकऱ्याला मुबलक पीक मिळते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरलेले असते. भगवंताच्या या कृपेने मिळालेल्या फळाबद्दल कृतज्ञता म्हणून मनुष्य मंदिरात जाऊन प्रभू चे गुण गाताना थकत नाही. भगवंता माझे वैभव हे तुझ्या कृपेचे फळ आहे असे मनुष्य भगवंताला सांगत असतो.
भगवंत मनुष्याला उत्तर देताना म्हणतो की मला माहित नाही मी तर चार महिने झोपी गेलो होतो हे सर्व वैभव आणि समृद्धी तुझ्या कामाचे परिश्रमाचे व पुरुषार्थाचे फळ आहे. काम करत असताना सतत जागृत राहणे आणि फळ येते त्यावेळी माहीत नसल्याचा बहाणा करून झोपी जाणे याच्यापेक्षा हृदयाची महान विशालता दुसरी कोणती असू शकेल का? खऱ्या कर्मयोग्याल्या याच्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ मार्गदर्शक कोण होऊ शकते?
यावरून असे निश्चित कळते की, मनुष्याने कर्म करत राहावे अभिमान बाळगू नये. भगवंत झोपी जातात म्हणजे अहम न ठेवता ते कर्म म्हणजे जगत व्यवहार चालवत असतात. मनुष्याने देखील कर्म करताना ‘मी’ ची समाधी लागू देऊ नये.
या पर्वाकडे पाहण्याची दुसरीही एक दृष्टी असू शकते ती म्हणजे विश्वासाची. अविश्वास भय निर्माण करतो. भयामुळे जागरणाला निमंत्रण मिळते. विश्वास शांती निर्माण करतो. शांती मुळे निद्रा प्राप्त होते. योग्य संततीवरील विश्वासाने बाप शांतपणे झोपू शकतो. त्याचप्रमाणे मानवावरील विश्वासाने निश्चिंत बनून भगवान जर झोपी जात असतील तर हे मानवाचे परम भाग्यच समजले पाहिजे.
Devshayani Ekadashi 2024: पंढरपूर, विठ्ठल आणि भक्त पुंडलिक

पंढरपूर हे शहर महाराष्ट्रातील सोलापूर शहराजवळ असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले हे शहर श्री विठ्ठल मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात.
पुंडलिक हे भगवान श्रीकृष्णाचे मोठे भक्त होते. पुंडलिक एकदा पंढरपुरातील आपल्या घरात आई वडिलांची सेवा करत होते. भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग त्यांच्या घरी आले. परंतु भक्त पुंडलिकांनी आई-वडिलांच्या सेवेला प्रथम प्राधान्य दिले आणि त्यांच्याजवळ असलेली एक वीट भगवान श्रीकृष्णांजवळ सरकवली. पुंडलिकांनी सरकवलेल्या विटेवर कंबरेवर हात ठेवून पांडुरंग प्रतीक्षा करत उभे राहिले.
“भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी” अशी महती आहे विठ्ठलाची. फक्त पुंडलिकाच्या म्हणण्यावरून पांडुरंग विटेवर उभे राहिले आणि त्यांच्या इच्छेनुसारच पंढरपुरात थांबले. पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल मूर्ती रूपात आजही तेथे वास्तव्य करतात.
हेही वाचा: संकष्ट चतुर्थी का साजरी केली जाते?
Devshayani Ekadashi 2024: आषाढी एकादशीचा उपवास
आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) म्हंटले की घरोघरी उपवासाचे विविध पदार्थ तयार होत असतात. आषाढी एकादशी निमित्त एक म्हण प्रचलित आहे, “एकादशी आणि दुप्पट खाशी”. आषाढी एकादशी जशी जशी जवळ येते तसतसे बाजारात उपवासाचे विविध खाद्यपदार्थ उपलब्ध होतात. खास करून राजगिरा, साबुदाणा, बटाटे, रताळे, शेंगदाणे, इत्यादी.
हल्ली उपवास आणि व्रत हे कर्मकांड आणि अंधश्रद्धा यात अडकल्याचे दिसून येते. खरंतर एकादशी, उपवास आणि व्रत यांचे खरे कारण आणि महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे.
निष्कर्ष
भक्ती ही पुंडलिकांसारखी असावी की ज्यांची भेट घेण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताला देखील वाट पहावी लागली होती. मनुष्याने कर्म करत रहावे अभिमान बाळगू नये. देवशयनी एकादशीला व्रतनिष्ठ होण्याचा संकल्प करावा आणि मनुष्याने त्याचे कर्म व आचरण असे ठेवावे की भगवंताला देखील निश्चिंत होऊन खरंच झोप घ्यावीशी वाटेल.
हेही वाचा: रामरक्षा स्तोत्र पठनाचे चमत्कारिक फायदे!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) पंढरपूर शहर कशासाठी प्रसिद्ध आहे?
पंढरपूर शहर हे श्री विठ्ठल मंदिर आणि आषाढी एकादशीला येणाऱ्या वारीसाठी प्रसिद्ध आहे.
2) चातुर्मास कधी सुरू होतो?
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो.
3) एकादशी कशाला म्हणतात?
प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात.
4) एका महिन्यात दोन एकादशी का येतात?
हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष पंधरवडे असतात आणि त्यामुळे शुद्ध तिथी आणि वद्य तिथी अशा दोन तिथ्या असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात तर आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात.
वारी चुकायची नाही (Vaari Chukaychi Nahi)
माहिती पुढे शेअर करा.