Janmashtami 2024: मेघांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस अशा वातावरणात कृष्ण अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जयंती (Shrikrishna Jayanti) किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी (Shrikrishna Janmashtami) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. गीतेचा उदगाता, लोकांचा तारणहार आणि मुक्ती दाता अशा उद्धारक भगवान कृष्णाचा जन्म झाला त्यावेळी सर्व लोक दुःख, संताप विसरून आनंद, उल्हासत नाचू लागले आणि तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून प्रसिद्ध पावला.
सामग्री सारणी
Janmashtami: भगवान श्रीकृष्णाचे अवतार कार्य
जेव्हा जेव्हा जीवनामध्ये अंधार दाटून येतो, सर्वत्र निराशेचे उदास वातावरण पसरते, समाजामध्ये अराजकता पसरते, वाईट गोष्टी पसरतात, सामान्य माणसांचा छळ होतो अशावेळी भगवंताला अवतार घ्यावा लागत असतो. श्रीकृष्ण (Shrikrishna) म्हणजे भगवान विष्णूंचे आठवे अवतार. आपल्या भारत भूमीमध्ये अनंत अवतार झाले आहेत. अशा भारत देशामध्ये यशस्वी, विजयी योद्धा, धर्म साम्राज्याचा निर्माता, मानवी विकासाच्या परंपरेचे नैतिक मूल्य समजावणारा उदगाता, धर्माचा महान प्रवचनकार, भक्तवत्सल, ज्ञानियांची वजिज्ञासूंची जिज्ञासा पूर्ण करणारा, जगद्गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्ण.

सत्ता किंवा संपत्तीशिवायही शेकडो लोकांची संघटना करणे शक्य आहे हे भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात करून दाखवले. भगवान श्रीकृष्णांनी गोकुळातील गवळ्यांना एकत्रित करून त्यांचे प्रेम संपादन केले. श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून गोकुळातील लोकांनी वर्षानुवर्षे चालत असलेली इंद्रपूजा सोडून गोवर्धनाची पूजा सुरू केली. गोकुळातील लोकांच्या संघटनेमुळे कंस, जरासंध इत्यादी लोकांच्या मान्यतेला मोठा धक्का बसला होता.
कृष्णाने सर्वांच्या हृदयाला जिंकले होते. सामान्य लोकांमध्ये त्यांनी आत्मप्रत्यय उभा केला होता. गवळण मध्ये मिसळून त्यांनी गवळ्यांना धर्मयुद्धा करिता जागवले. श्रीकृष्णाने अगासूर आणि बकासुर यांना ठार मारले. सर्वसामान्य नागरिकांमध्ये भर निर्माण केलेल्या कालिया नागाला नमवले. भगवान श्रीकृष्णांनी गोकुळाला स्वावलंबी, आरोग्य संपन्न, उद्यमशील आणि प्रेमळ बनवले होते.
श्रीकृष्णांनी देशातील पशुधनावर प्रेम करण्याचे शिकवले. विकी दांडू सारखा खेळ आणि मल्लयुद्धासारख्या मैदानी खेळाचे डावपेच श्रीकृष्णांनी प्रचलित केले. असुरी वृत्तीला घाबरणाऱ्या लोकांमध्ये त्यांनी तेजस्विता व अस्मिता निर्माण करून त्यांना निर्भय बनवले. गोपींमध्ये मिसळून त्यांच्यातील स्त्री शक्ती जागृत केली. स्त्री बदलली तर जग बदलते ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात प्रयोगाने सिद्ध करून दाखवली होती.
भगवान श्रीकृष्ण म्हणजे देवी संस्कृतीचा निःस्पृह, निरहंकारी व नम्र उपासक. ज्यावेळेस दुर्योधन कंस कालयवन नरकासुर शिशुपाल व जरासंध यांच्यासारखे आसुरी संस्कृतीचे प्रचारक समाजामध्ये तांडव करत होते त्यावेळी धर्म व नीती यांचे सुदर्शन चक्र हातात घेऊन श्रीकृष्णांनी या असुरांचा नाश केला होता.
जगाचा इतिहास नेहमी प्रवृत्ती व निवृत्ती यांच्यात चुलत राहिलेला आहे. या दोघांचा समन्वय भगवान श्रीकृष्णांनी साधलेला होता. श्रीमद् भगवद्गीते तुलनात्मक विचार मांडून श्रीकृष्णांनी प्रवृत्ती व निवृत्ती यांच्या समन्वयाचे माध्यम दिले. भगवान श्रीकृष्णांनी जीवनातील कर्मयोग समजावला आहे.
मृत्यूच्या छायेत, भीतीच्या भोवऱ्यात आणि आशेच्या आश्वासनात कृष्णाचा जन्म झाला होता. कृष्ण अबालवृद्ध सर्वांचा प्रिय बनला होता. बालकांचा जिवलग मित्र, तरुणांचा सखा आणि वृद्धांचा विसावा म्हणजे श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णांनी यौवणाच्या उन्मादाला लक्ष्मण रेषा आखली. भोग व स्वार्थ सिद्ध झाला नाही तरी स्त्रियांनी भगवान श्रीकृष्णांना हृदयात स्थान दिले होते.

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात की प्रत्येक मानवाच्या जीवनात श्रीकृष्णाच्या गीतेला, संस्कृती मातेचे पद प्राप्त झाले पाहिजे. तिचे दूध पिऊन प्रत्येक मानव पुष्ट झाला पाहिजे. डोक्यात कृष्णाचे विचार, हृदयात कृष्णा वरचे प्रेम, मुखात कृष्णाचे नाव आणि हाताने कृष्णाचे काम असा सुभग समन्वय प्रत्येकाच्या जीवनात झाला पाहिजे.
गोपाळकाला (Gopalkala) व दहीहंडी (Dahihandi) सामाजिक एकतेचे प्रतीक
भगवान श्रीकृष्ण लहान होते त्यावेळी घराघरातून लोण्याची चोरी करत होते. यामुळेच त्यांना माखनचोर म्हणून नाव पडले होते. बाळकृष्ण चोरी केलेले लोणी सर्व गोपाळांना वाटून खात होते आणि त्यामुळे सर्व गोपाळ धष्टपुष्ट होत होते. लोणी म्हणजे नवनीत, अर्क, सार. प्रत्येक घरात जे सार रूप असे जे काही घेण्यासारखे सद्गुण होते ते सर्व श्रीकृष्ण गोपाळ बालकांजवळ प्रदर्शित करत होते.
बाळकृष्ण गोपाळांसाठी घरोघरी जाऊन दही लोणीची चोरी करत असे. त्यामुळे गावातील महिलांना त्रास होत होता. कृष्णा पासून वाचण्याकरता महिला दही व लोणीची भांडी उंच ठिकाणी टांगत असे. भगवान कृष्ण बालपणी खोडकर होते. गोपाळांचा मनोरा तयार करून उंच टांगलेल्या भांड्यातील दही व लोणी चोरून काढत असे. या गोष्टीचीच परंपरा म्हणून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.
भगवान कृष्ण लहान होते तेव्हा आपल्या सवंगडींसोबत गाई चारण्यासाठी जात होते. श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी यमुनेच्या तीरावर पोहे, ज्वारीच्या लाह्या, धान्याच्या लाह्या, लिंबू, लोणचे दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी एकत्र करून त्याचे कालवण करून खात होते. श्रीकृष्णाला हा पदार्थ अत्यंत प्रिय होता आणि ह्याच पदार्थाला गोपाळकाला (Gopalkala) म्हणून ओळखले जाते.

दहीहंडी (Dahihandi) उत्सव काल आणि आज
भगवान श्रीकृष्णांनी गोकुळातील लहान बालकांपासून ते वृद्ध नागरिकांना एकत्र राहण्याचे शिकवले होते. श्रीकृष्ण लहानपणी आपल्या सवंगड्यांसोबत मानवी मनोरा तयार करून उंच टांगलेल्या भांड्यातील दही, लोणी चोरीत असे. त्याचेच प्रतीक म्हणून दहीहंडी उत्सव हा पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाऊ लागला होता. गावातील सर्व नागरिक जमा होऊन एखाद्या विशिष्ट जागी दोरीच्या साह्याने उंच जागेवर मातीची मडके बांधत होते.
मातीच्या मडक्यामध्ये दूध, दही भरलेले असे. मडक्याला फुलांनी सजवलेले असे. तरुण मंडळी मानवी मनोरा तयार करून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असे. गावातील इतर मंडळी नाचत गाजत दहीहंडीच्या या उत्सवात उत्साहीपणे सहभागी होत होते. यानिमित्ताने गावातील सर्व मंडळी एका ठिकाणी जमत होती आणि सामाजिक ऐक्य स्थापित होत होते. दहीहंडी फुटल्यानंतर काल्याचा प्रसाद सर्वांमध्ये वाटला जात होता.
काळ बदलत गेला, मानवी जीवन शैली बदलत गेली आणि उत्सव साजरा करण्याच्या पद्धती देखील बदलत गेल्या. आज दहीहंडी हा उत्सव संपूर्ण भारताचा महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये दहीहंडीच्या स्पर्धा भरवल्या जातात. दहीहंडी फोडण्याकरता जास्तीत जास्त थर लावण्याचे प्रयत्न तरुण मंडळी करत असतात.
हल्ली दहीहंडी फोडण्याकरता विविध शहरांमधील गोविंदा पथके स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. स्पर्धेसाठी मोठमोठाली डीजे, ढोल पथके, सिने सृष्टीतील कलाकार, इत्यादींचा सहभाग होत असतो. दहीहंडीच्या स्पर्धा अनेक राजकीय पक्ष भरवत असतात आणि त्यातून प्रत्येक राजकीय पक्ष व नेतेमंडळी आपले शक्ती प्रदर्शन करत असतात.
या आधुनिक युगात या पारंपरिक दहीहंडी उत्सवाला वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. दहीहंडी उत्सवात सामाजिक एकतेची प्रतीक आहे. परंतु आता दहीहंडी स्पर्धेसाठी असलेली भव्य दिव्य पारितोषिके राजकीय पक्ष व नेते मंडळींचे शक्तिप्रदर्शन यामुळे समाजात तेढ निर्माण होताना दिसतो. तरुण मंडळी आपापसात भांडणे करतात. अश्लील भाषा, अश्लील गाणे आणि अश्लील नृत्य यांचा सर्रास वापर या उत्सवात होताना दिसत आहे.
निष्कर्ष:
अतिशय उत्कृष्ट जीवन जगून दाखवणारा आणि अतिशय सामान्य रीतीने मृत्यूला सहजरित्या स्वीकारणारा कृष्ण हा भारताचा आदर्श पुरुष आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेसारखे अद्भुत तत्त्वज्ञान दिले आहे. गीता ही सांप्रदायिक संकुचितपणापासून मुक्त आहे. गीता मानव मात्राची आहे. भगवान श्रीकृष्णांनी जसे गोकुळातील गवळ्यांना एकत्र करून अन्यायाविरुद्ध लढण्याचे शिकवले त्याचप्रमाणे आज सर्वसामान्य मानवाने अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध लढले पाहिजे. भगवान श्रीकृष्णांचे विचार घरोघरी पोहोचवले पाहिजे. दहीहंडी व गोपाळकाला उत्सव साजरा करताना वर्ण, धर्म, जात, क्लेश, इत्यादींना विसरून सर्वांनी एकत्र येत सामाजिक ऐक्य जोपासले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने जन्माष्टमी साजरी केली जाऊ शकते.
हेही वाचा: मृत्युंजय मंत्राचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे काय?
श्रीकृष्ण जन्माष्टमी (Shrikrishna Janmashtami) हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आहे. हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. मथुरेत कृष्णाचा जन्म झाला त्यावेळी रोहिणी नक्षत्र होते, म्हणून हा दिवस विशेष पवित्र मानला जातो.
2. कृष्ण जन्माष्टमीला काय विशेष असते?
कृष्ण जन्माष्टमीच्या (Janmashtami) दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक, पूजा, आणि आरती केली जाते. मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म होतो, आणि त्यावेळी विशेष पूजा केली जाते. भक्त भजन, कीर्तन करतात, आणि उपवास धरतात.
3. गोपाळकाला म्हणजे काय?
गोपाळकाला (Gopalkala) हा श्रीकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित एक पारंपरिक उत्सव आहे. यामध्ये विविध अन्नपदार्थ, जसे पोहे, दही, लोणी, लाह्या एकत्र करून त्याचा प्रसाद तयार केला जातो. हे खाद्यपदार्थ श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय होते, आणि म्हणून हा उत्सव गोपाळकाला म्हणून ओळखला जातो.
4. दहीहंडीचा उत्सव कसा साजरा केला जातो?
दहीहंडी (Dahihandi) उत्सव श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित आहे. या दिवशी युवक मंडळी मानवी मनोरा तयार करून उंच टांगलेल्या दहीहंडीला फोडण्याचा प्रयत्न करतात. हा उत्सव महाराष्ट्रात विशेषत: मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.
5. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि कृष्ण जयंतीमध्ये काही फरक आहे का?
नाही, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि कृष्ण जयंती या दोन्ही एकाच उत्सवाचे वेगवेगळे नाव आहेत. दोन्ही नावे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी वापरली जातात.
6. गोपाळकाला उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व काय आहे?
गोपाळकाला उत्सव समाजातील एकता आणि सामूहिकतेचे प्रतीक आहे. या उत्सवाच्या माध्यमातून सर्वांमध्ये प्रेम, एकता, आणि आपसी स्नेह निर्माण करण्याचा संदेश दिला आहे.
7. दहीहंडी उत्सवाचा इतिहास काय आहे?
दहीहंडी उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित आहे. लहानपणी कृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत दही, लोणी चोरण्यासाठी मानवी मनोरा तयार करत असे, त्याच प्रसंगाची आठवण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.
भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांचे भावपूर्ण गीत ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती आवडल्यास पुढे शेअर करा.