Manoj Jarange Patil News: महाराष्ट्र राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मध्यरात्री सगेसोयरे यांच्याबाबतीत राज्य सरकारने अध्यादेश देखील काढला म्हणूनच संपूर्ण मराठा समाजाला मोठं यश मिळालं आहे.
आज दी.२७ जानेवारी २०२४ रोजी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल झाले व त्यांनी मनोज जरांगे यांचे उपोषण सोडले. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, संजय शिरसाठ देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री यांनी सरकारने काढलेला अध्यादेश मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्त केला.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असे सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे असे जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली.तसेच मी मुख्यमंत्री यांच्या हस्ते ज्यूस पिऊन माझे उपोषण सोडणार आहे असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

नवी मुंबईतील वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपूर्ण मराठा बांधवसह मनोज जरांगे यांची विजयाचा गुलाल उधळत विराट सभा पार पडली.
हेही वाचा: पंतप्रधान मोदी यांनी केली सूर्योदय योजनेची घोषणा
शेवटी मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश मिळालं आहे. मध्यरात्री तब्बल तीन तासांच्या चर्चेनंतर राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे मराठ्यांचा मोर्चा गुलाल उधळत आणि जल्लोष करत मुंबईच्या वेशीवरून माघारी फिरणार आहे.
Manoj Jarange Patil News: मागासवर्ग आयोगाच्या हालचालींना वेग
महाराष्ट्र राज्य सरकारने 13 नोव्हेंबर 2023 रोजी पाठवलेल्या पत्रानुसार राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील मराठा समाज, खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समांतर पातळीवर राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला पत्र पाठवून मराठा समाजातील नागरिकांच्या जमिनीची माहिती मागवली आहे. मराठा समाजातील नागरिकांकडे किती जमीन आहे याबाबतची 1960 ते 2020 या कालावधीतील माहिती मागविण्यात आली आहे.
मराठ्यांच्या विजयानंतर भुजबळ आक्रमक झाले
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय, परंतु, मला तसं काही वाटत नाही. अशा रीतीने झुंडशाहीने नियम आणि कायदे बदलता येत नाही. आम्हीही मंत्रीपदाची शपथ घेताना कोणालाही न घाबरता काम करू आणि निर्णय घेऊ, कोणाच्याही बाजूने निर्णय घेणार नाही असं म्हटलं होतं. आम्ही सर्व मंत्रिमंडळाने तशी शपथ घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सध्या एक अधिसूचना काढली आहे याचं नंतर कायद्यात रूपांतर होईल. तत्पूर्वी 16 फेब्रुवारी पर्यंत त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजांमधील जे वकील असतील, सुशिक्षित असतील त्यांनी या निर्णयावरील हरकती ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं मी आवाहन करतो. लाखोंच्या संख्येने या हरकती पाठवाव्या. आम्ही लाखोंच्या संख्येने सरकारला अशा हरकती पाठवू असे छगन भुजबळ म्हणाले.
आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार मिळतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की ‘एक मराठा लाख मराठा’ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मराठ्यांनी संयमी पणे या ठिकाणी आंदोलन केलं राज्य सरकारने तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत मराठा समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळांना न्याय देण्याचं काम राज्य सरकार करेल. हे सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करेल, हा शब्द मी या ठिकाणी देतो तसेच मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो, असे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनावेळी घोषणा केली होती की मराठा आरक्षण घेणार आणि मुंबईत विजय गुलाल उधळणार. परंतु, मुंबईत दाखल होण्यापूर्वीच राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांना विजयाचा गुलाल लावला आहे.
आंतरवाली सराटीसह राज्यभर विविध मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याचीही मनोज जरांगे पाटलांनी मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली असून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील मुंबईत जाणार नाहीत
विजयाचा गुलाल उधळण्याकरता मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार होते. परंतु, आता ते मुंबईत जाणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्या झाल्या मान्य
1) नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. म्हणजे एका नोंदीवर पाच नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळाले तरी दोन कोटी मराठा समाज ओबीसी मध्ये जाणार आहे. परंतु नोंदी मिळालेल्या परिवाराने प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करायला पाहिजे. आता 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या आहेत तसेच आतापर्यंत 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे.
2) शिंदे समिती रद्द करायची नाही, ही मागणी मान्य झाली. राज्य सरकारने दोन महिने मुदत वाढवली आणी समितीची मुदत आणखी टप्प्याटप्प्याने वाढवणार असल्याचे मान्य केले.
3) सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही, ज्या महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे नोंद नाही, त्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायची आहे. हे शपथ पत्र 100 रुपयांना आहे. परंतु ते मोफत देण्याचे मान्य केले आहे.
4) आंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे आहे. गृह विभागाकडून पत्र नाही ते पत्र लागणार असल्याचे सांगितले आहे. ते ही मिळणार आहे.
5) क्युरीटीव्ह पिटीशन चा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगे सोयऱ्यांचा माध्यमातून एखादा व्यक्ती राहिला तर, यामुळे मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही आणि शासकीय भरती केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून भरायच्या आहेत, ही मागणी मान्य झाली आहे.
कोण आहेत मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. मात्र लग्नानंतर ते जालना जिल्ह्यात स्थायिक झाले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी ते लढा देत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक मोर्चे काढले तसेच अनेक आंदोलनही केले आहेत.
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी काम करतात. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. लहानपणापासून समाजसेवेची आवड होती. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई वडील असं मनोज जरांगे यांचं कुटुंब आहे. ते शेतकरी असून मराठा समाजाचा आंदोलनासाठी त्यांनी आपली जमीन विकली आहे असं म्हटलं जातं.
सुरुवातीच्या काळात ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी शिवबा संघटना स्थापन केली. याद्वारे त्यांनी समाजात मराठा आरक्षणाची ज्योत पेटवण्याचे काम केले. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कोटा रद्द केल्यानंतर त्यांनी जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे तीन महिन्यांच आंदोलन केले होते. या आंदोलनात शेकडो लोक सामील झाले होते.
सप्टेंबर 2023 मध्ये अंतरवाली सराटी या गावात ते उपोषण करत होते त्यावेळी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मराठा समाज आणि पोलिस यांच्यात चकमक झाली, पोलिसांनी लाठी चार्ज करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. यात अनेक मराठा बांधव जखमी झाले होते. या घटनेनंतर मराठा आरक्षण आंदोलनला दिशा मिळाली. तसंच हे आंदोलन राज्यभर देखील पसरले.