Diploma Admission 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. दहावी बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी विविध पर्यायांच्या शोध घेत असतात. काही विद्यार्थी आर्टस्, कॉमर्स, सायन्स व आयटीआयचा विचार करतात, तर बरेच विद्यार्थी इंजीनियरिंगच्या डिप्लोमाचा पर्याय निवडतात. आज देशभरासह महाराष्ट्रात देखील डिप्लोमाच्या कॉलेजेसची संख्या वाढत आहे. अशावेळी डिप्लोमाला ॲडमिशन घेण्यासाठी योग्य कॉलेजची निवड करण्यासाठी विद्यार्थी व पालकांना मोठी कसरत करावी लागते. चला तर मग जाणून घेऊया डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी योग्य कॉलेज कसे निवडावे?
सामग्री सारणी
Diploma Admission 2024 – प्रवेश प्रक्रिया
Diploma Admission 2024: डिप्लोमाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमधून जावे लागते. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या आवडतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन विकल्प नमुना भरून त्याची पुष्टी करावी लागते. यासाठी विदयार्थ्याला आवडतीच्या कॉलेजचा/संस्थेचा विकल्प क्रमांक ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागतो. तंत्र शिक्षण संचनालायच्या विविध नियमानुसार विद्यार्थी पात्र असेल तर त्याला त्याच्या पसंतीची कॉलेज मिळू शकते.

Diploma Admission 2024 – असे निवडा पसंतीचे कॉलेज
Diploma Admission 2024: डिप्लोमाला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते की आपल्याला उत्कृष्ट कॉलेज मिळावे आणि तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या योग्य संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. आज बदलत्या तंत्रज्ञानानुसार रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या जरी अनेक संधी उपलब्ध झाल्या असतील तरी कुशल डिप्लोमा अभियंत्यांची कमतरता कायम भासत असते. डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क्स मिळालेले असतात परंतु ते कंपनीमध्ये काम करण्यास असमर्थ असतात. डिप्लोमा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्यक्षात नोकरी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये प्रचंड फरक जाणवत असतो आणि त्याची अनेक कारणे आहेत.
प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याच्या अनेक पद्धती
Diploma Admission 2024: आपल्याला सर्वांना माहिती आहे की डिप्लोमाच्या प्रथम किंवा द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी इयत्ता दहावी किंवा बारावी व आयटीआयचे विद्यार्थी पात्र असतात. विद्यार्थी जेव्हा दहावी, बारावी किंवा आयटीआयच्या शेवटच्या वर्षी शिकत असतात तेव्हा डिप्लोमा कॉलेज मधील शिक्षक त्यांच्याशी विविध माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात.
काही डिप्लोमा कॉलेजचे शिक्षक त्यांच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढविण्यासाठी शाळेशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. काही डिप्लोमा कॉलेज दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनच्या नावाखाली त्यांच्या कॉलेजला घेऊन जात असतात. तिथे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रलोभने दाखवले जातात.
काही डिप्लोमा कॉलेजचे शिक्षक दहावी बारावीचे खाजगी क्लासेस, MS-CIT क्लासेस, इत्यादी अनेक प्रकारचे क्लासेस मधून विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. विद्यार्थी जेव्हा उत्तीर्ण होतात तेव्हा त्यांना अनेक कॉलेजमधून प्रवेश घेण्यासाठी दिवसभर कॉल येत असतात. सततच्या येणाऱ्या कॉलने विद्यार्थी व पालक अक्षरशः कंटाळून गेलेले असतात.
काही डिप्लोमा कॉलेजेस प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांसाठी सेमिनार व विविध कार्यशाळांचे आयोजन करत असतात. यासाठी तज्ञ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असते.

Image Source: Bengal Polytechnic College
प्रवेशापूर्वी प्रत्यक्ष कॉलेजला भेट देणे गरजेचे
Diploma Admission 2024: डिप्लोमाच्या शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज हजारो कॉलेजेस उपलब्ध आहेत. यापैकी काही सरकारी, खाजगी कॉलेजेस विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण व सुविधा पुरवित असतात. परंतु अनेक खाजगी कॉलेजेस प्रवेशा करिता विद्यार्थ्यांची दिशाभूल देखील करत असतात. कॉलेजेसचा निसर्गरम्य परिसर, उत्तुंग इमारती यामुळे विद्यार्थी कुठलाही विचार न करता प्रवेश घेण्यासाठी तयार होऊन जात असतात. प्रवेश घेण्याआधी विविध गोष्टी पडताळून पाहणे आवश्यक आहे.
अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग
Diploma Admission 2024: विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी प्रत्यक्ष त्या कॉलेजला भेट देऊन तेथे शिकविण्यासाठी अनुभवी व तज्ञ शिक्षक उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करावी. तंत्रशिक्षण संचलनालयाने आखून दिलेल्या नियमानुसार शिक्षकांची भरती करणे आवश्यक असते. डिप्लोमाच्या काही कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांची कमतरता असते. शिकवण्याचा अनुभव नसलेले व नुकतेच इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण करून पास झालेले शिक्षक देखील विद्यार्थ्यांना शिकवत असतात. शिकविण्याचा अनुभव नसल्यामुळे असे शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रवेश घेताना विद्यार्थी व पालकांनी याची खात्री करणे आवश्यक आहे की कॉलेजमध्ये प्रत्येक विभागात अनुभवी व तज्ञ शिक्षकांची पुरेशी संख्या आहे की नाही.

सुसज्ज प्रयोगशाळा व प्रात्यक्षिके
Diploma Admission 2024: डिप्लोमाच्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर दिलेला असतो. बऱ्याच शासकीय व खाजगी कॉलेजमध्ये प्रात्यक्षिकांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा असतात आणि प्रात्यक्षिके शिकविण्यासाठी अनुभवी शिक्षक देखील असतात. परंतु काही कॉलेजमध्ये प्रयोगशाळेत उपकरणांची कमतरता असते. काही कॉलेजमध्ये उपकरणे हे फक्त कागदोपत्री असतात. अश्या कॉलेजमध्ये उपकरणांची देखभाल न घेणे, उपकरणे दुरुस्त न करणे, अभ्यासक्रमाशी निगडित उपकरणांची खरेदी न करणे अशा विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना योग्य प्रात्यक्षिक ज्ञान मिळत नसते.

काही कॉलेजमध्ये प्रयोगशाळेत उपकरणे असून देखील प्रात्यक्षिके होत नाहीत त्याचे कारण म्हणजे प्रात्यक्षिके करून दाखविण्यासाठी अनुभवी शिक्षकांची कमतरता. शिकविण्याचा अनुभव नसलेले शिक्षक प्रयोगशाळेत उपकरणे हाताळण्यास असमर्थ असतात किंवा त्यांना प्रात्यक्षिके करून दाखवता येत नसतात.
म्हणून विद्यार्थी व पालक ज्यावेळेस प्रत्यक्ष कॉलेजला भेट देत असतात तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधने आवश्यक आहे. असे देखील दिसून येते की काही कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना आधीच सांगून ठेवलेले असते की प्रवेश प्रक्रिये दरम्यान नकारात्मक बाबींच्या चर्चा करू नये. म्हणून त्या कॉलेजमधून पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद सत्ता आला तर योग्यच.
हेही वाचा: 10वी नंतर पुढे काय? पॉलिटेक्निक एक उत्तम पर्याय!
निकालाची परंपरा
Diploma Admission 2024: विद्यार्थी व पालक ज्यावेळेस प्रत्यक्ष कॉलेजला भेट देतात तेव्हा त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत देखील चौकशी केली पाहिजे. महाराष्ट्रातील डिप्लोमाच्या शैक्षणिक संस्था या तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याशी संलग्न असतात. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी तंत्रशिक्षण मंडळाकडून परीक्षेदरम्यान भरारी पथकांचे आयोजन केले जात असते.
असे दिसून येते की काही संस्था प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवत असतात. जसे की एखादा विद्यार्थी नोकरी करत असेल आणि त्याने डिप्लोमाला प्रवेश घेतलेला असेल तर तो विद्यार्थी कॉलेजला हजर राहिला नाही तरी चालतो. त्याची हजेरी, प्रात्यक्षिके इत्यादी गोष्टींची जबाबदारी संबंधित कॉलेज घेत असते. सदर बाब ही तंत्र शिक्षण मंडळाच्या नियमाविरुद्ध असते. इतकेच काय काही डिप्लोमाची कॉलेजेस परीक्षेतील गैरप्रकाराला पाठिंबा देखील दर्शवित असतात. परीक्षेतील अशा गैर प्रकारांमुळे कॉलेजचे ॲडमिशन वाढत असते. विद्यार्थी अभ्यास न करता परीक्षेला जात असतात. तंत्र शिक्षण मंडळाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर अशा कॉलेजेसवर कारवाई देखील होत असते.
परंतु कुठलेही ज्ञान न घेता पास होण्यात काहीही अर्थ नाही. परीक्षेतील गैर प्रकारामुळे पास झालेले विद्यार्थी स्पर्धेच्या युगात तग धरू शकत नाही. म्हणून नेहमी निकालाची परंपरा योग्य पद्धतीने राखणाऱ्या कॉलेजेस मध्येच प्रवेश घ्यावा.
रोजगार व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन
विद्यार्थी व पालक ज्यावेळेस कॉलेजला भेट देत असतात त्यावेळी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल देखील आढावा घेतला पाहिजे. कॉलेज मार्फत कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन केले जाते का नाही? रोजगार व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले जाते का नाही? औद्योगिक प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन, इत्यादी बाबी तपासल्या पाहिजे.
निष्कर्ष:
विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सतर्क राहून कॉलेजबद्दल सर्व बाबींची चौकशी व खात्री करूनच प्रवेश निश्चित करावा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1) डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी किती मार्क्स लागतात.
इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण असलेले व कमीत कमी 35% गुण मिळविणारे विद्यार्थी डिप्लोमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी पात्र असतात.
2) डिप्लोमाची स्वायत्त संस्था म्हणजे काय?
स्वायत्त संस्था ह्या शैक्षणिक अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षा इत्यादी गोष्टी स्वतः आयोजित करत असतात.
3) MSBTE म्हणजे काय?
MSBTE म्हणजे Maharashtra State Board of Technical Education (महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ) होय.
माहिती पुढे शेअर करा.