Savarkar Jayanti 2024: सर्व भारतीय 28 मे 2024 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांसमोर त्यांच्या 141व्या जयंतीनिमित्त नतमस्तक होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव असलेले भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाज सुधारक, हिंदुत्व संकल्पनेचे प्रणेते विनायक दामोदर सावरकर यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे संपूर्ण जीवन अर्पण केले होते. असंख्य भारतीय तरुणांचे आदर्श असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे जीवन चरित्र अत्यंत महान होते.
सामग्री सारणी
Savarkar Jayanti 2024: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्राथमिक जीवनाचा परिचय
प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा नाशिकच्या भूमीत भगूर येथे 28 मे 1883 रोजी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला होता. सावरकरांना बाबाराव सावरकर हे मोठे बंधू तर नारायणराव सावरकर हे धाकटे बंधू होते. सावरकरांचे वय नऊ वर्षे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. मोठे बंधू बाबाराव सावरकर यांच्या पत्नी येसू वहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला.

सावरकर वाडा, भगूर, नाशिक
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. काव्यरचना, वक्तृत्व यांवर त्यांचे प्रभुत्व होते. चाफेकर बंधूंना फाशी झाली त्यावेळी सावरकर हे लहान होते. परंतु फाशीचे वृत्त समजताच आपल्या कुलदेवी आई भगवती पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेतली.
Savarkar Jayanti 2024: क्रांतिकार्यास सुरुवात
विनायक दामोदर सावरकर यांचा विवाह 1901 मध्ये यमुनाबाई यांच्याशी झाला होता. लग्नानंतर त्यांनी 1902 साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. आपले साथीदार पागे आणि म्हसकर यांच्या सहाय्याने राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना त्यांनी स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना स्थापन केल्यानंतर याच संघटनेचे पुढे अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झाले. 1905 साली सावरकरांनी पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांना घेऊन इफ सी रोडला विदेशी कापडाची होळी केली होती.
त्यावेळी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे कायद्याच्या अभ्यासासाठी 1906 मध्ये सावरकर लंडनला गेले. लंडन मधील इंडिया हाऊस मध्ये राहत असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले. लंडनमध्ये इंडिया हाऊस मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झालेले होते. ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करत हसत हसत फाशी स्वीकारणारे मदनलाल धिंग्रा हे सावरकरांचे पहिले हुतात्मा शिष्य होते. सावरकरांनी इतर देशातील क्रांतिकारी संघटनांशी संपर्क साधून बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले होते.
राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले होते. सावरकरांनी बॉम्ब बनविण्याचे तंत्रज्ञान व 22 ब्राऊनिंग पिस्तुले भारतात पाठवली होती. या पिस्तुलांपैकी एका पिस्तुलाने अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या कलेक्टरला ठार मारले. त्यामुळे अभिनव भारताच्या अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या तीन सदस्यांना फाशी झाली होती. ब्रिटिश सरकारला सुगावा लागला होता की पिस्तूल ही सावरकरांनी पाठवली होती त्यामुळे त्यांनी त्यांना तत्काळ अटक केली.

सावरकरांना समुद्र मार्गाने भारतात आणले जात असताना त्यांनी फ्रान्सच्या एका बेटाजवळ बोटीतून उडी मारली आणि पोहत पोहत समुद्रकिनारा गाठला. किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना त्यांची भाषा समजली नव्हती आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. भारतात आल्यावर सावरकरांवर खटला भरवण्यात आला. सावरकरांना दोन जन्मठेपांची काळ्यापाण्याची शिक्षा झाली. सावरकरांना अंदमानच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते.
हेही वाचा: कारसेवक म्हणजे काय?
Savarkar Jayanti 2024 – काळ्या पाण्याची शिक्षा:
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळ कोठडीत ठेवले होते. ब्रिटिश सरकारने सावरकरांना खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाच्या काथ्या कुटण्याचे कष्टकरी काम दिले. सावरकरांना ब्रिटिश सरकार खूप छळत होते, मरणप्राय वेदना देत होते. सावरकरांनी बाभळीच्या काट्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिले. अंदमानच्या काळ कोठडीत सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला.

Savarkar Jayanti 2024 – अंदमानातून सुटका:
6 जानेवारी 1924 रोजी सावरकरांची अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाली होती. सुटका झाल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले होते. हिंदू समाजाच्या अधःपतनाला जातीव्यवस्था, चातुर्वर्ण्य जबाबदार आहे हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू संघटन करण्यासाठी आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुःखी होईल याची पर्वा न करता अंधश्रद्धा, जातीभेद यांच्यावर सावरकरांनी हल्लाबोल चढवला होता. रत्नागिरीत राहत असताना अनेक समाज उपयोगी काम त्यांनी केले. त्यांनी शेकडो मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केले आणि त्या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. त्यांनी सामायिक भोजनालय देखील सुरू केले व अनेक आंतरजातीय विवाह लावले. जातीभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला.
ब्रिटिशांनी सावरकरांना रत्नागिरीत सुमारे 13 वर्ष स्थानाबद्दल केलेले होते. सावरकरांनी अनेक वर्ष हिंदू महासभेचे अध्यक्ष पद भूषविले होते. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धीवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला. ज्वलंत साहित्यिक, समाजसुधारक, क्रांतिकारक सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान दिले होते. तत्कालीन कॉंग्रेसच्या धोरणांना व फाळणीला त्यांनी प्रखर विरोध दर्शविला होता.
देशाला जरी स्वातंत्र्य मिळाले होते तरी सावरकरांनी देशाची सीमा सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढविणे, अशा अनेक महत्त्वाच्या विषयांचा त्यांनी आग्रह धरला होता. सावरकरांनी आपल्या जीवनातील तब्बल 60 वर्ष स्वातंत्र्य व सुराज्य यासाठी अर्पण केले होते.
Savarkar Jayanti 2024 – भाषा शुद्धीचा आग्रह:
स्वातंत्र्यवीर सावरकर एक थोर महान कवी व साहित्यिक होते. भाषा शुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले आहेत. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, किलकराष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनीक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षण, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तीवेतन, महापौर, हुतात्मा, असे अनेक मराठी शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत. 1938 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर राहिले होते.

असा संपला महान क्रांतिकारकाचा जीवनप्रावास
भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी व समाजप्रबोधनासाठी सावरकरांनी आपले जीवन अर्पण केलेले होते. वयाच्या 83 व्या वर्षी म्हणजेच 1966 मध्ये सावरकरांनी प्रायोप्रवेशनाचा निर्णय घेतला होता. दिनांक 1 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले आणि एका महान क्रांति पर्वाचा अंत झाला.
निष्कर्ष:
महान भारतीय क्रांतिकारक, राजकारणी, वकील, कवी, लेखक, समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांचे स्वतःचे संपूर्ण जीवन भारत मातेसाठी व समाजप्रबोधनासाठी अर्पण केलेले होते. सावरकरांचे 60 वर्षांचे देशासाठीचे बलिदान नक्कीच अंगावर काटे आणणारे आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1) सावरकरांचे पूर्ण नाव काय?
विनायक दामोदर सावरकर.
2) सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी कोणी दिली होती?
सावरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उपाधी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली होती.
3) सावरकरांचा जन्म कोणत्या गावी झाला होता?
सावरकरांचा जन्म हा नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी झाला होता.
4) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रसिद्ध कविता कोणत्या?
सागरा प्राण तळमळला, हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, जयोस्तुते आणि तानाजीचा पोवाडा या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.
5) स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणते?
माझी जन्मठेप.
6) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली मित्रमेळा आणि अभिनव भारत संघटना एकच आहे का?
होय.1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारी गुप्त संघटना स्थापन केली होती. 1904 साली याच संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले.
हेही वाचा: 10वी नंतर पुढे काय? पॉलिटेक्निक एक उत्तम पर्याय!
माहिती पुढे शेअर करा.