भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव म्हणजेच बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.

गौतम बुद्धांचा जन्म हा सिद्धार्थ गौतम म्हणून झाला होता. सिद्धार्थ हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व शाकलचे राजपुत्र होते. भौतिक सुखांचा व वैभवाचा त्याग करत सिद्धार्थांनी गृह त्याग केला.

गृह त्यागानंतर त्यांनी सत्याच्या शोधासाठी 7 वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली, बोधगया येथील बोधिवृक्षाखाली वैशाख पौर्णिमेला त्यांना बुद्धत्व म्हणजेच ज्ञानप्राप्ती झाली व ते गौतम बुद्ध म्हणून प्रसिद्ध झाले. 

बिहारमधील बोधगया है बौद्ध धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात.

बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात. संपूर्ण घर हे फुलांनी सजवले जाते. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथाचे वाचन, पठण केले जाते.

आजच्या दिवशी बोधीवृक्षाचीही पूजा केली जाते. बोधीवृक्षाच्या आजूबाजूला दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते.

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी गौतम बुद्धांनी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग स्वीकारला. वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला.

गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपले पहिले प्रवचन दिले. या प्रवचनात बौद्ध धर्माची मूलतत्वे त्यांनी समजावून सांगितली. बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता त्यांनी बौद्ध संघ निर्माण केला.

गौतम बुद्धांनी चार आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, पंचशील तत्वे, दहा पारमिता यांचा अर्थ सामान्य लोकांना अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितला.