यावर्षी दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेचा म्हणजेच व्यास पूजेचा दिवस. या दिवशी संस्कृती घडविण्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचे पूजन केले जाते.

व्यास ऋषींनी आपल्याला वेदांचे ग्रंथ दिले. संस्कृतीचा ज्ञानकोशरूप महाभारत ग्रंथ दिला. सांस्कृतिक विचार ज्या पिठावरून सांगितले जातात त्या पिठालाही आज व्यासपीठ म्हंटले जाते.

ब्रह्मदेवाप्रमाणे सदगुणांचा निर्माता, विष्णूप्रमाणे सदवृत्तींचा पालक व महादेवाप्रमाणे दुर्गुण व दुवृत्तींचा संहारक, तसेच जीव व शिव यांचे मिलन करवणारा गुरु हा साक्षात परब्रम्हासमान आहे.

व्यास ऋषी समाजाचे खरे गुरु होते. परंपरेप्रमाणे व्यास पूजेला गुरुपूजा मानली गेली आणि व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली. गुरु म्हणजे जो लघु नाही आणि जो लघूला गुरु बनवतो तो.

जी व्यक्ती जीवनाला मनाच्या ताब्यात जाऊ देते तो लघु आणि जो मनाचा स्वामी होतो तो गुरु. जीवनाच्या निसरड्या प्रवाहातही जो स्थिर उभा राहू शकतो तो गुरु. गुरुपूजन म्हणजे ध्येय पूजन. 

भारतात गुरुपरंपरा होती. मी कुणाचा तरी आहे हा मधुर भाव त्यात होता आणि या भावनेत कृतज्ञता होती. आज गुरुपूजा गुरु वादात परिवर्तित झालेली असून त्यामुळे मानव अंधश्रद्धा व अज्ञानाच्या अंधारात चाचपडत आहे. 

आजच्या आधुनिक परिस्थितीत वित्ताचे, संपत्तीचे हरण करणारे गुरु पुष्कळ मिळतील, पण जीवन बदलवून टाकणारे, हृदय परिवर्तन करणारे, डोळ्यात तेज आणि बुद्धीत खुमारी निर्माण करणारे गुरु दुर्लभ आहेत.

ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमालय अशा गुरुचे या दिवशी पूजन करायचे असते. गुरु पूजन म्हणजे सत्याचे पूजन. गुरु पूजन म्हणजे सद्गुरुचे पूजन.

संस्कृती रक्षणात व संस्कृती घडविण्यात ज्यांनी योगदान दिले अशा सर्व महान गुरूंप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करून खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी करूया.