प्रभू श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान यांचे नाव घेतले की शूर, बुद्धिमान, महावीर, पवनपुत्र, अश्या इत्यादी अनेक प्रतिमा डोळ्यासमोर तयार होतात.

महादेवांचे अवतार समजले गेलेले श्री हनुमानजी चिरंजीव म्हणजेच अमर आहेत. आजच्या कलियुगातही महाबली हनुमानजींचे वास्तव्य आपल्या अवतीभवती अदृश्य रूपात आहे.

हनुमान हे प्रभू श्रीरामांचे परमभक्त आहेत. राम भक्ती करणाऱ्या व्यक्तींवर हनुमानांची विशेष कृपा असते. संकटात असणाऱ्या रामभक्तांसाठी महाबली हनुमान नेहमी धावून येत असतात.

भारतातील बहुतांश घरात एकतर हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे वाचन केले जाते किंवा ऐकले जाते. कित्येक लोक तर सकाळी व संध्याकाळी हनुमान चालीसा नक्कीच ऐकतात.

हनुमान चालीसा हे अवधी भाषेतील संत तुलसीदास रचित 40 श्लोकांचे दोहा आणि चौपाई स्वरूपातील स्तोत्र असल्यामुळे तिला चालीसा असे म्हणतात. श्री हनुमान चालीसाची रचना 16 व्या शतकात केली गेली होती.

मारुती स्तोत्र हे मराठी भाषेत असून ते रामदास स्वामींनी 17 व्या शतकात लिहिले आहे. मारुतीच्या स्तोत्रांचे अनेक रूपे असले तरी रामदास स्वामींनी लिहिलेले मराठीतील स्तोत्र विशेष प्रसिद्ध आहे.

मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा या दोन्ही रचना जरी वेगवेगळ्या संतांनी लिहिल्या असल्या तरी त्यात भक्तीभाव आणि हनुमानांच्या गुणांची स्तुतीपर रचना दिसून येते.

भूत, पिशाच, घरातील संकटे, आर्थिक समस्या, दीर्घकाळ आजार, शनीची दशा, भीती, इत्यादी संकटे या दोन्ही स्तोत्राच्या पठणाने नाहीसे होऊन यश, आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा, यांमध्ये वाढ होते.